Sunday, November 26, 2023

DELHI | तीन दिवसांचा आठवडा असायला काय हरकत आहे? : बिल गेट्स

नवी दिल्ली : माणसांच्या कामांचे तास किती असावेत? यावर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनी एक महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की तीन दिवसांचा आठवडा असला तरीही ठीक आहे. तसेच एआयबद्दलही त्यांनी भाष्य केले. AI मुळे तुमची नोकरी जाईल असे नाही मात्र यामुळे गोष्टी बदलतील इतके नक्की असे ही गेट्स यांनी म्हटले. दक्षिण आफ्रिकेचे विनोदी कलाकार आणि लेखक ट्रेव्हर नोह यांच्या पॉडकास्ट 'व्हॉट नाऊ'मध्ये बोलताना त्यांनी यावर  भाष्य केले. 
 तीन दिवसांचा आठवडा असायला काय हरकत आहे?
 बिल गेट्स म्हणाले,'' तीन दिवसांचा आठवडा असेल तरीही काही हरकत नाही.नोकऱ्यांमध्ये AI सारखे कृत्रिम तंत्रज्ञान येत आहे त्याविषयी काय सांगाल? असे  विचारले असता बिल गेट्स म्हणाले एक दिवस असाही येऊ शकतो की खूप मेहनत करावी लागणार नाही. आपल्या जगतात अशी एक वेळ येऊ शकते की आठवड्यातले तीन दिवसच काम केले तरीही चालणार आहे. काही दिवसांपूर्वीच इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी युवकांनी ७० तास काम केले पाहिजे असे  म्हटले होते. त्यानंतर आता बिल गेट्स यांचे हे वक्तव्य चर्चेत आले.
 एक असेही जग असू शकते जिथे मशीन द्वारे जेवण तयार केले जाईल, जीवनावश्यक वस्तू तयार केला जातील आणि लोकांना आठवड्यात पाच दिवसांऐवजी फक्त तीन दिवस काम करावे लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत बिल गेट्स म्हणाले की, याचा प्रभाव नक्कीच मोठा पडणार आहे. मात्र माणसांचे काम AI संपवणार नाही. कामाच्या पद्धतींमध्ये बदल किंवा ज्याला फरक म्हणता येतील असे होतील, असे ही बिल गेट्स म्हणाले.
 लोकांना कमी कालावधीसाठी काम करु देण्यास हरकत नसलेले बिल गेट्स हे एकमेव व्यावसायिक नाहीत. जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमन यांनीही साडेतीन दिवसांचा आठवडा आणि बाकी सुट्ट्या असतील असे एक वक्तव्य केले होते.इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा विचार करायला हवा अशी टिप्पणी केल्यानंतर ऑनलाइन वादाला तोंड फुटले होते. 
 पॉडकास्टमध्ये, मूर्ती म्हणाले होती की, भारताची कार्य उत्पादकता जगात सर्वात कमी आहे आणि देशाचा विकास सुनिश्चित करण्यासाठी, तरुणांनी आठवड्यातून किमान ७० तास काम करणे आवश्यक आहे. नारायण मूर्ती यांच्या विधानावरून वाद सुरु असताना सुधा मूर्ती यांनी नारायण मूर्ती हे स्वतः आठवड्यातून ८० ते ९० तास काम करतात असे म्हणत ट्रोलर्सना उत्तर दिले होते. तर अन्यही काही व्यावसायिकांनी मूर्ती यांच्या विधानाला अनुमोदन दिले होते. तर काहींनी त्यांना विरोध दर्शवला होता. बिल गेट्स यांच्या वक्तव्यामुळे नारायण मूर्ती यांच्या त्या वक्तव्याची पुन्हा एकदा नेटिझन्सना आठवण झाली.

Labels: , ,