Saturday, December 9, 2023

AMRAVATI CITY NEWS | व्यापाऱ्यांच्या कापूस कट्टीला बाजार समितीमध्ये लगाम


अमरावती | येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना क्विंटलमागे अर्धा किलोची कपात (कट्टी) व्यापाऱ्यांद्वारे केली जायची. मात्र सभापती, उपसभापती, अडते व खरेदीदार यांच्यात बैठक होऊन, ही कट्टी शुक्रवारपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांचे क्विंटलमागे ५० रुपये वाचले आहे.

साधारणपणे फेडरेशन बंद झाल्यापासून कापूस बाजार समित्यांमध्ये विक्री होऊ लागला व तेव्हापासून व्यापाऱ्यांद्वारा क्विंटलमागे ५०० ग्रॅम कट्टी आकारल्या जायची व यासाठी विविध कारणे देण्यात येत असे. याशिवाय कापूस खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांद्वारा शेतकऱ्यांना थेट पेमेंट होत असताना काही अडत्यांद्वारे क्विंटलमागे १५ रुपयांची अडत आकारणी व्हायची. त्यामुळे शेतकऱ्यांकडून क्विंटलमागे ५० रुपये नियमबाह्यरीत्या घेतल्या जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे सभापती हरीश मोरे यांनी गुरुवारी संबंधितांची बैठक बोलावली. यामध्ये कट्टी बंद करण्याचा शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. 

यावेळी उपसभापती भैयासाहेब निर्मळ, संचालक राजेश पाटील, प्रमोद इंगोले, खरेदीदार राजेश पमनानी, इब्राहीम मन्सुरी, अनिल पनपालिया, शंकर आहुजा यांच्यासह सचिव दीपक विजयकर, पवन देशमुख आदी उपस्थित होते. 

...तर अडते, दलालावर कारवाई

या बैठकीमध्ये कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांजवळून अडत व दलाल घेण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांजवळून अशा प्रकारे अडत किंवा दलाली घेतल्यास व याबाबत शेतकऱ्याची तक्रार प्राप्त झाल्यास कृषी उत्पन्न खरेदी विक्री (प्रचालन व सुविधा) अधिनियम १९६३ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सभापती हरीश मोरे यांनी सांगितले.